केडीएसपी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष सगळे याला पाणी फाउंडेशन बैठकीसाठी निमंत्रण
महाराष्ट्रातील जलसंधारण चळवळीला चालना देण्यासाठी Paani Foundation यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भारतभरातून ३० हून अधिक डिजिटल कंटेंट क्रिएटर्स सहभागी झाले होते.
या बैठकीसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटिल कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी व @AgriwalaMarathi या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रतिनिधी आयुष सगळे याला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्याने या उपक्रमात सहभागी होत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
बैठकीत Aamir Khan यांनी पाणी फाउंडेशनच्या १२ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. ‘सत्यमेव जयते’ पासून सुरू झालेल्या या चळवळीने महाराष्ट्रातील जलसंधारण आणि शेती क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना (Agri Students) विशेष संदेश देताना त्यांनी सांगितले की, “शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हीच शेतीत बदल घडवू शकता.”
तसेच बैठकीत जलसंधारण, शेतीतील सुधारणा, तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी डिजिटल माध्यमांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व क्रिएटर्सनी या चळवळीचा भाग बनून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


